मुंबई : यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनचे (Monsoon) जोरदार आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, त्या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून घरातही पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्यातील जोरदार पावसानंतर पावसाने (Rain) दडी मारली असून राज्यभरातील बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे. आज काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यातच, मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईसाठी पुढले तीन दिवस महत्वाचे ठरणार आहे. कारण, पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी, मुंबई आणि उपनगरांत 2 तारखेपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे चिन्ह आहे. तर, दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी 12 तारखेच्या पुढे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचे भाकीत केलं आहे.
12 ते 20 जून या कालावधी मोठा पाऊस येणार असून बीड जिल्ह्यातील तळी भरुन जाणार आहेत. कारण, जेव्हा मान्सून पूर्वेकडून येतो तेव्हा बीड, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मुसळधा पाऊस पडतो. सध्या पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी शेतीतली सर्व कामे उरकून घ्यावी,कारण 12 ते 20 जून या कालावधीत राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, कोकण, खान्देश, मराठवाडा सगळीकडेच 12 जूनपासून पाऊस पडणार आहे. आजपासून या पावसाला सुरुवात होणार असून पुढील 4 दिवसांत हा पाऊस वाढत जाणार आहे. त्यामुळे, 12 तारखेपर्यंत पेरणी करू शकता, सोयाबिन पेरणाऱ्यांनी 12 तारखेच्या एक दिवस अगोदपर्यंतच सोयाबिन पेरणी करावी, असे आवाहन डख यांनी केले आहे.
चंद्रपुरात जोरदार पाऊस
चंद्रपूर शहरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने तापमानात मोठी वाढ झाली होती. 42 अंशपर्यंत तापमान पोहोचल्यावर आज संध्याकाळी चंद्रपुरात अचानक मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने सामान्य लोकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
रत्नागिरीत मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठ जलमय झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकाने आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून, काही ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा
बेकायदेशीर रजिस्ट्री, जिल्हाधिकारी कर्डिलेंचा दणका; नांदेडमध्ये दुय्यम निबंधक तत्काळ निलंबित
आणखी वाचा