Maharashtra Weather News : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं आता तरी माघार घ्यावी असंच सर्वांना वाटत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे पावसाचा आणि आता म्हणावं तर या न परतणाऱ्या वरुणराजाचा वाढलेला मुक्काम. एकिकडे मान्सूननं देश सोडला अशी वृत्त असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा इशारा देत यलो अलर्ट काही जिल्ह्यांसाठी लागू केला आहे.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगवान वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजाच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी प्रचंड उष्मा आणि सायंकाळनंतर काहीसं ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समुद्रात घोंगावणारे वारे संकटांची चाहूल देणारे?
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार तामिळनाडूच्या सागरी किनाऱ्यापासून काही अंतरावर असणाऱ्या पश्चिम बंगालच्या उपसागर क्षेत्रामध्ये दक्षिण पश्चिमेस एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. प्राथमिक स्वरुपात त्याची तीव्रता कमी असली तरीही पुढच्या 24 तासांमध्ये त्यात वाढ होणार आहे. ज्यामुळं प्रामुख्यानं या समुद्रातून घोंगावत येणाऱ्या संकटाचा परिणाम हा दक्षिण किनारपट्टी राज्यांना बसणार आहे. तर, महाराष्ट्रावरही याचा कमीजास्त स्वरुपातील परिणाम दिसून येईल.
दमट वातावरणानं सारेच बेजार…
एकिकडे पावसाळी वातावरणामुळं ढगांची दाटी नव्हे, कोंडी होत असल्या कारणानं दमट हवामानाच वाढ होत आहे. ज्यामुळं उष्मा आणि दाह अधिक भासत असून काँक्रिटीकरण झालेल्या शहरी भागांमध्ये या ऑक्टोबर हिटच्या झळा नागरिरांना बेजार करताना दिसत आहेत. तर, डोंगराळ भागांमध्ये असणाऱ्या खेड्यापाड्यांमध्ये पहाटेचा गारवा दिलासा देऊन जात आहे. हवामानाची सद्यस्थिती संमिश्र असली तरीही राज्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आवल्यानं आता हा पाऊस नेमका कुठे बरसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/C1eYTp2y4y
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 22, 2025
प्राथमिक माहितीनुसार तळ कोकण, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाट क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्रात या सरींची हजेरी षअसेल. तर, पुढच्या दोन दिवसांमध्ये विदर्भातही पावसाच्या सरींची हजेरी असेलय ज्यामुळं ऑक्टोबर हिट, पाऊस आणि दमट वातावरण असं विचित्र हवामान राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या चिंतेत भर टाकणार हे नाकारत येत नाही.
FAQ
ऑक्टोबर महिन्यात पावसाचा मुक्काम का वाढला आहे?
मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने आता माघार घेतली नाही, कारण देशभरून मान्सून गेला असला तरी महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आजचा हवामानाचा अंदाज काय आहे?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी प्रचंड उष्णता राहील, तर सायंकाळनंतर ढगाळ वातावरण होईल. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट लागू आहे.
कोणत्या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे?
पुढील 24 तासांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. यात ताशी 30 ते 40 किमी वेगवान वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस अपेक्षित आहे.